Sunday, October 9, 2016

मिरासदारी

                                                                  'मिरासदारी'

आत्ताच द. मां. चे ‘भोकरवाडीतील रसवंतीगृह’ पुस्तक वाचून खाली ठेवतोय . खूप दिवसांनी रविवारी दुपारी खळखळून हसलो. द. मा. खरंच Great आहेत, त्यांची पुस्तके आणि गोष्टी शिळ्या व्हायला तयारच नाहीत. कितीतरी वेळा त्यांच्या गोष्टी वाचल्या आहेत पण दर वेळी वाचताना तेवढेच पोट धरून हसू येते जेवढे पहिल्या वेळी आले होते. बर, ‘विनोदाला कारुण्याची झालर’ वगरे काही नाही. पहिल्या परिच्छेद ते शेवटचे वाक्य नुसती धमालच धमाल.  
सरांची पात्र निर्मिती अफलातून असते.  त्या पात्राचे बोलणे , लकबी , स्वभाव, सर असा काही वर्णन करतात की डोळ्यासमोर तो माणूस उभा राहिलाच पाहिजे. ‘ग्रामीण विंनोद’ म्हणून कोणी दुर्लक्ष कराल तर मोठ्या आनंदाला मुकाल. कुठे थोडा अधिक चावटपणा असेल पण अश्लीलतेचा स्पर्शही नाही, कुठे कमरेखाली घसरणे नाही. चावटपणा येतो तो सुद्धा पात्राच्या स्वभावाला आणि प्रसंगाला धरून. प्रसंगनिष्ठ विनोद निर्मितीत सरांचा हात धरतील असे फार थोडे लेखक असतील. इतक्या पुस्तकात आणि गोष्टीत कुठे तोचतोचपणाही नाही.
ही इरसाल आणि गमतीशीर खेडूत पात्रे कशी सुचली याचे उत्तर त्यांनी त्यांच्या ‘ माझ्या विनोदाची उलट तपासणी ‘ या लेखात फार छान दिलय. त्यांचे वडील प्रख्यात पंढरपूर भागातले प्रख्यात वकील, अर्थातच त्या भागातली लोकं त्यांच्याकडे सल्ल्याकरता आणि त्यांच्या case करता यायची.
काय निरीक्षण आणि स्मरणशक्ती असेल सरांची, कुमारवयात ऐकलेले पाहिलेले ते वातावरण , ती खेडूत माणसे , त्यांच्या बारा भानगडी, सरांनी अश्या काही खुबिनी आपल्या गोष्टीत आणल्या आहेत कि बस रे बस.   
मी द. मां. चे एखद-दुसरे पुस्तक वाचले आहे असे म्हणणारा विरळाच. सर वाचनात एकदा आले की कायमचेच , मग त्यांचे प्रत्येक पुस्तक आणि गोष्ट वाचायचा नाद नव्हे तर व्यसनच लागते.
हे व्यसन मी अनुभवलंय, ते इतके कि त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टीतील पात्रांच्या तोंडचे सगळे dialog आम्ही मित्र एकमेकांना मारायचो, अजूनही मारतो. (हे म्हणजे Andaz Apna Apna किंवा Hrishiikesh मुखर्जींच्या चुपके चुपके सारखे आहे, कितीही वेळा बघा, कंटाळा नाहीच).सगळी पुस्तके वाचून झाली कि ६ महिने जाऊद्या, मग एखाद्या उदास किंवा कंटा
ळ्याच्या वेळी डोळे बंद करून सरांचे कोणतेही पुस्तक हातात घ्या, दुसऱ्या मिनटाला पोट धरून हसू. अश्या अनेक उदास आणि कंटाळवाण्या संध्याकाळ द.मां. नी प्रफुल्लीत केल्या आहेत.
      अशी ही सतत हवीहवीशी वाटणारी ही ‘मिरासदारी’ नक्कीच संग्रही असायला हवी.
द.मां. च्या पाककृतीतून बनलेल्या या ‘हसणावळीत’, ‘माकडमेवा’ आणि ‘बापाची पेंड’ यांची चविष्ट ‘सरमिसळ’ तर आहेच पण ‘चकाट्या’ पिटायच्या वेळी, ‘गप्पांगणात’, ‘बेंडबाजा’ वाजवत, ‘गुदगुल्या’ करत सांगितलेल्या या ‘गोष्टीच गोष्टी’, चार ‘विरंगुळ्याचे’, खूप खूप हसण्याचे क्षण देऊन जातात. अजून काय पाहिजे ?
                                                            ---------पराग साळसकर

No comments: